शनिवार, ९ मे, २०१५

मला पडलेले प्रश्न

संतुलितपणाचा कळस असतो आयुष्य म्हणजे. रोज उठून नव्या आशा जागृत होतात, जुन्या, काही कारणाने बुजलेल्या आशा पुन्हा डोकं वर काढतात, आणि जसजसा दिवस सरत जातो, तशा, तेवढ्याच प्रमाणात, प्रसंगी जास्त त्रास देणा-या निराशाही पदरी पडत जातात. कधी निराशा दुसरं कोणी करतं, कधी आपली आपणच करतो. आपल्याच तत्त्वांना झुगारून देतो. आपल्याच दांभिकपणाचं वायफळ समर्थन करतो. आपण स्वतःलाच फसवू पाहतो. आणि समजावूनही देतो.

यश नेमकं कशात असतं? स्वतःला हरवण्यात, की स्वतःबरोबर जिंकण्यात? कसं ओळखावं की आपण बरोबर वागतोय? कसं जाणावं की इथे आपण दाखवत असलेला संयम हा संयम नसून टाळाटाळ आहे? एखादी स्फूर्ति ही केवळ एक लहर नसून ती नांदी आहे एका नव्या अंकाची, हे स्वतःला नेमकं कसं सांगावं?

मला कोणी समजूनच घेत नाही असं आयुष्यात एकदातरी म्हणणारे खूप असतात. मीही अपवाद नाही म्हणा. पण निदान मी तरी स्वतःला समजून घेतो का? कसं ओळखावं स्वतःला? आपला स्वतःशी असलेला प्रामाणिकपणा हा नेमका कुठे मर्यादा ओलांडतो? कारण आपल्या क्षमतेबद्दल मनात प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा मनापासून येणारं नकारार्थी पण प्रामाणिक उत्तर बहुतांशवेळा आपल्याला चांगल्या गोष्टींपासून वंचित ठेवू शकतं. कारण ते पूर्वानुभवांवर बेतलेलं असतं. मग नवा अनुभव घ्यायचा की नाही, हे नेमकं कशाच्या जोरावर ठरवतो आपण? मनात विचारपूर्वक निर्माण केलेली/झालेली प्रेरणा की उत्स्फूर्तपणे आलेली लहर? शेवटच्या क्षणी निर्णय कोणाचा ग्राह्य धरतो?

बरं हे सगळे वायफळ विचार तरी का करावे? इतकं आत्मकेंद्री का व्हावं? काय मिळतं एवढ्या खोलवर शिरून? तसं म्हटलं तर काय मिळतं जगून? मृत्यू? मग तो मिळवण्याची वाट का पाहायची? कारण ध्येयापेक्षा प्रवास अतिरंजक म्हणून?

गंमत अशी आहे की इतका गोंधळ उडूनही, गाडी कुठेच अडत नाही. ती चालूच राहते. नवे फाटे फोडत राहते. विचारचक्र सुरूच राहतं. कधीच पंक्चर होत नाही. भटकंती सुरू राहते. कायम. निरंतर.

© कौस्तुभ अनिल पेंढारकर.

(हा लेख या ब्लाॅगवर शनिवार दिनांक 9 मे 2015 रोजी भारतातून रात्री 09.01 वाजता प्रकाशित करण्यात येत आहे. या लेखाचे सर्व हक्क लेखकाच्या नावाने सुरक्षित आहेत.

लेखकाच्या संमतीशिवाय या लेखनाचे लेखकाला श्रेय देऊन अथवा न देऊन पुनःप्रकाशन करणा-यावर लेखकाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: