सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

इंग्लिश मिडियम!! कशाला??

गेल्या आठवड्यात एकदा रस्त्यावरून चाल्लो होतो तेव्हा रस्त्याच्या पलिकडच्या बाजुने एक हत्ती जात होता(लोकांकडून त्याच्या माहुतासाठी पैसे आणि स्वत:साठी खायला जे काय मिळेल ते मिळवत...). माझ्या समोरुन मला एक आई तिच्या लहान मुलीला घेऊन येताना दिसत होती. ती आपल्या मुलीचं लक्ष त्या हत्तीकडे वेधत होती. तेवढ्यात त्या गजराजाने भर रस्त्यात भलामोठ्ठा प्रसाद दिला. तशी ती बाई मोठ्ठ्याने आपल्या मुलीला म्हणाली, ‘‘ते बघ शर्वरी, एलिफंटने शीऽऽ केली!!’’ मला त्या हत्तीचा ताजा पो बघून वाटली नसेल एवढी किळस त्या बाईचं वाक्य ऐकून वाटली. ही कसली पद्धत मुलांना इंग्लिश शिकवायची? आणि नाहीतरी त्यांना इंग्लिश मिडियमात घातलंच आहे तर मग शाळेत शिकतील की ती इंग्रजी. निदान एरव्ही बोलताना तरी सरळ मातृभाषेत बोला. आमच्या इथल्या एका काकूबाईंना आपल्या मुलीला, ‘‘हे बघ स्टडी कर नाहीतर गॉड तुला पनिश करेल हा!’’ असा दम भरतानासुद्धा ऐकलंय मी. हे सगळं ऐकल्यावर आधी पोट धरुन हसायला येतं खरं, पण नंतर त्याबद्दल विचार केला की तितकंच वाईटही वाटायला लागतं. माझी आजी नेहमी म्हणते, की माणसाने बोलताना एकाच कोणत्यातरी भाषेत बोलावं. मराठीत बोलताना मराठीत, इंग्रजीत बोलताना इंग्रजीत. एका भाषेत बोलताना उगाच दुसऱ्या भाषेचे शब्द वापरू नयेत. मला ते नेहमीच पटत आलेलं आहे. इंग्रजी ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे, इंग्रजी फ्लुएंटली बोलता येणं ही काळाची गरज आहे, त्यामुळे आपलं मूल हे इंग्लिश मिडियमात शिकलं तर स्मार्ट होईल, पुढे अभ्यासात मागे पडणार नाही, कॉलेजात इंग्लिश नीट बोलता न आल्याने उगाच त्याला कॉम्प्लेक्स येणार नाही, पुढे आयुष्यात सुद्धा त्याला काही त्रास होणार नाही, तेव्हा आपण त्याला इंग्लिश मिडियममध्येच घालूया... आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण करुया!! असं ठरवून आजचे आई-बाबा मुलांना इंग्रजी शाळांमध्ये घालतायत. त्यात आपल्या धन्य सरकारच्या शिक्षणविषयक धन्य धोरणांमुळे मराठी माध्यमाच्या शाळांची धुळधाण उडत चाल्लीये, आणि परिणामी मराठी माध्यमात घालायची ईच्छा असूनही केवळ मराठी शाळांमध्ये नीट शिकवलं जात नाही, अशा समजूतीमुळे नाईलाजास्तव(किंवा ते निमित्त पुढे करून) आई-बाबा आपल्या प्रिय पाल्याला इंग्लिश मिडियममध्ये टाकतात. मग मुलाच्या कल्याणाची सुरुवात होते. सुरुवात केजीपासून(आजकाल खरं तर प्ले ग्रूपपासून...) होते. मराठी माध्यमातला, शिशुवर्गातला, जुनाट वाटणाऱ्या साध्या रंगसंगतीच्या गणवेशातला शेंबडा मुलगा फुकटात किंवा नगण्य किंमतीत शिक्षण घेत असतो. आणि इंग्रजी माध्यमातला, पॉश युनिफॉर्ममधला, केजीतला, स्मार्ट दिसणारा(त्याला शेंबूड येत नाही वाटतं) मुलगा शिक्षण घेण्यासाठी वर्षाचे किती रुपये मोजत असतो? जास्त नाही, फक्त 60-70 हजार!! हो, फक्त केजीसाठी साठ-सत्तर हजार मोजणारे पालक आहेत आज, इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपल्या मुलाने शिकावं अशी ईच्छा असते ना त्यांची! त्याने त्यांची किंवा त्यांच्या मुलाची कुली सोन्याची होत असावीत, त्याशिवाय केजीसाठी एवढे पैसे मोजण्यात काय अर्थ आहे, हे मला कळत नाही. इतकंच नाही, या केजीतल्या मुलांना होमवर्क सुद्धा असतो म्हणे!! अहो, तिसरीपर्यंत मला गृहपाठ या शब्दाचा अर्थच माहिती नव्हता, आणि या मुलांना सरळ केजीपासून होमवर्क?? काय? तर अक्षरं गिरवा वगैरे... त्यासाठी या मुलांची ट्युशन्स घेणारी मंडळीसुद्धा आहेत बरं का! केजीत शिकवण्या?? एक काळ असा होता की शिकवणीला जावं लागलं, की मुलं लाजेने ओशाळून जायची. बरं या शिकवण्यासुद्धा शाळेचे शिक्षक फुकटात घेत असतील. आणि आता केजीसाठी ट्युशन्स?? वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी, मुलांच्या बोटांच्या हाडांची रचना/वाढ तरी पूर्ण झालेली असते का? अशा स्थितीत त्यांना गाढवासारखी गिरवागिरवी करायला लाऊन त्यांच्या बोटांच्या रचनेची वाट नाही का लागणार? मला आठवतंय तेवढं शिशुवर्गात मी असताना आम्हांला नुसती अक्षरओळख करुन दिली होती. चित्रं दाखवून प्राण्यांची ओळख करुन दिली जायची. आणि असाच काहीतरी साधा-सोपा, शिशुवर्गाला साजेलसा अभ्यासक्रम असायचा. अभ्यास कसला, नुसती धम्माल होती सोमवार ते शुक्रवार रोज दोन तास फक्त. केजीत कुणी नापास व्हायचं नाही, आणि कोणी करुही नये. आता प्रायमरीत जाऊया. पहिलीत आल्यानंतर माझ्या हातात आधी पाटी-पेन्सिल आली. त्या पाटीवर अर्धा-एक महिना सराव केल्यानंतर वही-पेन्सिलशी ओळख झाली. तेव्हा आधी आम्हांला, //??!’()+- अशी चिन्हं काढायला शिकवलं. त्यानंतर बाराखडी, मग पुढचं सगळं. प्राथमिक शाळेत अगदी पहिल्यापासून हात व्यवस्थित जोडून (अंगठे सुद्धा बोटांच्या रेषेत सरळ ठेऊन) याकुंदेंदुतुषारहारधवला चालीत म्हणायची सवय लावली गेली. स्तोत्रांना वार दिले गेले होते. मंगळवारी प्रणम्यशिरसादेवं, शनिवारी भीमरूपी महारुद्रा; दहा मनाचे श्लोक आणि सगळी रामरक्षा हे आम्ही रोज म्हणत असू. त्यामुळे उच्चार स्वच्छ, स्पष्ट आणि शुद्ध व्हायला मदत झाली. दुसरीत गेलो तेव्हा पहिलीपासूनच मराठी माध्यमाच्या शाळांमधून इंग्रजी विषय सुद्धा शिकवण्याची योजना अंमलात (काळाची गरज नाही का!) आली. तेव्हा चौथीपर्यंत इंग्रजीची फक्त तोंडी परीक्षा घेतली जाऊ लागली. लेखी माध्यमिकमध्ये गेल्यावर. मी म्हणे आधी जरा बोबडा होतो. पण प्राथमिक शाळेत आल्यानंतर माझी वाणी, माझे उच्चार व्यवस्थित सुधारले. सगळ्यांच्याच बाबतीत होतं असं नाही, पण इंग्रजी माध्यमात गेलेल्या आणि तोतल्या राहिलेल्या बऱ्याच मुलांना पाहिलंय मी. त्यांच्या घरी कोणी तोतरं नाही किंवा त्यांची जीभही मुळात जड नाही. तरीही ही बोबडेपणाची अडचण! कशामुळे? कारण ज्या वयात शुद्ध-स्पष्ट बोलायची सवय लावायला हवी, त्या वयात हाय-फाय आणि स्टायलीश शैलीची इंग्रजीच फक्त काय ती शिकवली गेल्याचा हा परिणाम! माध्यमिक शाळेत गेल्यानंतर तर आनंदीआनंद होता. तरी मराठी माध्यमात आल्यामुळे कधीही अभ्यासात पाठी पडायची वेळ आली नाही. इंग्रजी हा तर माझा सर्वात लाडका विषय होता. पण मी माझी ही इंग्रजीविषयीची आवड अभ्यासापुरतीच मर्यादित ठेवली. कोणी म्हणालं, तुझं ठीक आहे रे, तू हुशार आहेस म्हणून निभावून नेलं. म्हणजे?? मूल मूळातच हुशार असलं, तर मराठी काय आणि इंग्लिश मिडियम काय, ते अभ्यासात चमकेलच... त्यावर भाषेच्या माध्यमाचा फारसा परिणाम होत नाही. उलट जर एखाद्या मुलाची बौद्धिक पातळी कमी असली, तर त्याला तो स्मार्ट होईल, या आशेने इंग्लिश मिडियममध्ये घालणं घोडचूक ठरतं. उलट त्यांना मराठी माध्यमातून शिक्षण घेणं सोप्पं जातं. याचा अर्थ मराठी इंग्रजीच्या तुलनेत सोप्पी आणि म्हणून थुकरट आहे असा होत नसून, त्यामागचं कारण ‘कोणत्याही व्यक्तिला कधीही कोणतीही गोष्ट आपल्या घरी बोल्ल्या जाणाऱ्या आपल्या मातृभाषेतून समजावली, की लवकर लक्षात येते; तीच गोष्ट परकीय भाषेतून समजावणं अवघड जातं’, हे आहे. त्यामुळे बौद्धिक पातळी कमी असणारी मुलं जर इंग्लिश माध्यमात गेली, तर मराठीत राहून पडली नसती एवढी मागे पडतात, लहानपणातच ताणतणावाने हैराण होतात, प्रसंगी त्यांचं मानसिक संतुलनही बिघडण्याचा संभव असतो. आणि याची जिवंत उदाहरणंसुद्धा मी पाहिलीयत. पण आपल्या मुलाची बौद्धिक पातळी कमी आहे, हे कोणता पालक म्हणायला तयार होईल? तेही तो मुलगा अवघा चार वर्षांचा असताना? अशावेळी आपल्या बौद्धिक पातळीवरून मुलाच्या बुद्ध्यांकाचा अंदाज बांधून निर्णय घेतला, तर तो मुलाच्याच हिताचा ठरतो नाहीका? याचा अर्थ सगळ्या ढ मुलांनी मराठीत जावं, आणि हुशार मुलांनी इंग्रजीत, असा अजिबात होत नाही. हुशार मुलांनी सुद्धा मराठीतच जायला हवं. कारण तेच, सवयीच्या भाषेतून शिक्षण घेतल्याने त्यांना इंग्रजी माध्यमात मिळाला नसता एवढा वाव मराठीतून शिक्षण घेतल्याने मिळू शकतो. आणि मराठीला कैवारी हवाच नाहीका? वाचनाची आवड सगळ्यानाच नसली, तरी बऱ्याच मुलांना असते. वाचणारी मुलं वाचतातच. वाचनाच्या सवयीत इंग्लिश-मराठी माध्यम हा मुद्दा येत नाही. पण मराठीतून शालेय शिक्षण घेतलेली, आणि मराठीबरोबरच इंग्लिश पुस्तकं वाचणारी मुलं बरीच दिसतात. त्याउलट, इंग्लिशमधून शालेय शिक्षण घेतलेली, आणि वाचनाची आवड असलेली मुलं, ही मराठी पुस्तकं वाचताना कमीच आढळून येतात. अर्थात, ठरावीक घरांच्या इतर संस्कारांमुळे यात अपवाद आढळून येऊ शकतात, पण तरीही ते कमीच... ‘अहो पण पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्लिश फाडफाड बोलणाऱ्या मुलांमध्ये आमच्या मुलाला कॉम्प्लेक्स येईल त्याचं काय?’ काही होत नाही. कॉम्प्लेक्स येत नाही असं माझं म्हणणं नाही, मलाही आला होता. पण साता-समुद्रापार राहणाऱ्या गोऱ्या चामडीच्या ज्या डुकरांनी माझ्या देशाला सतत दिडशे वर्षं लुबाडलं, त्या लोकांची भाषा फाडायला मला जमत नाही, याविषयी यत्किंचितही लाज बाळगावी असं मला वाटत नाही. याउलट इंग्रजीतून शिक्षण घेणाऱ्या मुलांची अवस्था, निदान सांस्कृतिकदृष्ट्या तरी खूप वाईट असते असं माझं स्पष्ट मत आहे. ङ म्हणजे ड वर डॉट, आणि ञ हे ज सारखं काहीतरी अक्षर आहे असा समज; ळ, ण चे चुकीचे उच्चार; स्त्रीलिंगी-पुल्लिंगी असा काही भेदभाव न करता सगळ्या शब्दांना सरळ नपुंसक करुन टाकणे; सामान्यरूप, विभक्तीप्रत्यय कशाशी खातात हे माहिती नसल्याने गहूची पोळी, विज्ञानची वही असे शब्दप्रयोग हे या मुलांमध्ये हमखास दिसून येतात आणि ही मुलं स्वत:चं यामुळे वेळोवेळी हसं करून घेतात. अर्थात अशा मुलांची संख्या आज हसणाऱ्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांना काही फरक पडत नसावा. उदाहरण दिल्याशिवाय माझंच समाधान होणार नाही म्हणून एक किस्सा सांगतो. एकदा शाळेच्या मधल्या सुट्टीत आमच्या इंग्रजी माध्यमाच्या मित्रांबरोबर आम्ही मराठी मिडियममधली मुलं गप्पा मारत उभी होतो. एक इंग्रजीचा मुलगा सारखं, ‘माझी चुकी नाही, तुझी चुकी आहे’ असं म्हणत होता. शेवटी मला न राहवून मी म्हटलं, ‘अरे, चुकी नाही रे, चूक! चुकी हे सामान्यरूप झालं!’ तर तो मुलगा ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हणाला. मी म्हटलं, ‘सॉरी बाबा, तुला समजवायला गेलो ही माझीच मिस्टूक झाली!’ तसे सगळेजण एकसुरात ‘मिस्टेक!!!’ असं ओरडले. मी लगेच ‘तेच रे ते! काय फरक पडतो?’ असं म्हटल्यावर हशा पिकला. नुकत्याच आई झालेल्या माझ्या काही मावश्यांना मी 'काय? मराठी मिडियम ना?' असं विचारलं, की 'शीऽऽऽऽऽ मराठी काय??' असं ब-याचदा ऐकावं लागतं. मराठी शाळांचा दर्जा खालवतोय, तेव्हा मराठीसाठी असलेल्या कळवळ्यापोटी आपल्या मुलांचं आयुष्य का बर्बाद करु, असा विचार करुन जर इंग्रजीत घालत असाल, तर विचार जरा बदला. आज तुम्ही मुलांना मराठीत घालून एक उत्तम उदाहरण लोकांसमोर ठेवलंत, तर आणि तरंच उद्या मराठी शाळांसाठी मागणी वाढेल. तुमच्या मुलांना मराठीचे कैवारी करा, तुमची मुलं चमकतीलच, मराठीही चमकू लागेल.

गुरुवार, ७ मार्च, २०१३

निसर्ग आणि माणूस

जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती. कारण् तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणी राहून आपण ही घाण होतो, म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांंबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं, आणि अक्कल भरा भरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, केजी म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमावलेल्या अकलेचा एक टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय. इथे निसर्गाचा एकच कायदा आहे. आपण जगायचं, दुसऱ्याला मारायचं. सर्व्हायव्हल्‌ ऑफ द फिटेस्ट! माणूस निसर्गाच्या वर चढू पाहतोय म्हणतात. शक्यच नाही. निसर्गाने मानवाला जसा तयार केलाय, तसाच तो वागतोय. तो कोणतेच नियम तोडत नाही. मानवाने इतर प्राण्यांची शिकार केली, म्हणून आज काही प्रजाती नष्ट होतात. इतिहासात मानव यायच्या आधीही बऱ्याच प्रजाती नष्ट झाल्यात की. आणि शिकार काय माणूसच करतो? वाघ, सिंह, बिबट्या, तरस, लांडगे, चित्ता, असे भरपूर पशू आहेत. मानव हा सुद्धा पशुच. मानवाला पशु म्हटल्याने ना पशुंचा अपमान होतो, ना मानवाचा. कारण खरंच तो पशुच आहे, आणि पशुप्रमाणेच वागत आलाय, वागतोय. त्यात काही चुकीचं नाही. माणूस झाडं तोडतो. तोडत असेल, पण त्याचा काहीतरी वापर करतो. हत्ती, माकडं, यांना मस्ती चढली की विनाकारण कित्येक झाडं हकनाक मरतात. माणूस धरणं बांधून गावं बुडवतो. निसर्ग कित्येक गावं-शहरं तशीही अधुन मधुन बुडवतच असतो की. शेतकऱ्याला सुखवणारा पाऊस, काही पक्ष्यांना, किड्या-मुंग्यांना भारी पडु शकतो की. निसर्गातील कोणतीही घटना, त्या घटनेने निर्माण झालेली अवस्था, ही नेहमी काही प्रकारच्या सजीवांना मदत करते, तर काहींचा ऱ्हास करते. आपण स्वत:ला निसर्गापेक्षा वेगळे का मानतो हेच मला कळत नाही. सोयीचं जातं म्हणून? अरे पण या सोयीच्या फंदात आपण आपलं मूळ विसरुन जातो त्याचं काय! आपण बांधलेली इमारत ही "मानव-निर्मित' आणि पक्ष्यांनी बांधलेली घरटी, मुंग्यांनी बांधलेली वारुळं, मधमाश्यांची पोळी ही मात्र "निसर्गाची किमया'!!! का? आपल्या बिल्डींग्ज, टॉवर्स, इतर सर्व वास्तु, वस्तु, ही निसर्गाचीच किमया आहे. आपण जर कशाची निर्मीती केली, तर ती निसर्गाची कल्पकता आहे. आणि जर आपण विध्वंस केला, तर तो निसर्गाच्या रुद्रावताराचाच एक भाग आहे. त्यामुळे आपण आज कितीही प्राण्यांची शिकार करुन त्यांच्या जाती नष्ट केल्या, कितीही खनिजं उकरुन पृथ्वीच्या पोटातलं सगळं वापरुन संपवून टाकलं, तरी निसर्गाची काळजी करायचं काही कारण नाही. फार फार तर काय होईल? सगळे बर्फ वितळतील, बरेच जीव मरतील. त्यात माणसं सुद्धा. मरुदेत!! निसर्गाला काही फरक पडणार नाहीये. या घटनेला आपण "महा प्रलय' असं जरी नाव दिलं, तरी त्यात विशेष असं काही घडणार नाही. एके काळी जगात जिकडे तिकडे डायनासोर होते. आता ते कुठेही आढळत नाहीत. उलट असं मानलं जातं की डायनासोर सारख्या अजस्र प्राण्याच्या ऱ्हासामुळे इतर अनेक लक्षावधी लहान-मोठ्या जीवांना उत्क्रांत होण्याची संधी मिळाली. तसंच मनुष्यजातीचा ऱ्हास झाल्यावरही होईलच. आज मानवजात जिकडे तिकडे पसरलीये. महाप्रलयानंतर ती समजा नष्ट झाली. झाली तर झाली. डायनासोर गेले म्हणून निसर्गाचं काही बिघडलं का? मग माणूस गेल्यावर तरी का बिघडेल? कोण मोठे लागून गेलो आपण? आणि सगळेच जीव तर जाणार नाहीत. निसर्गाची किमयाच म्हणायची, तर महाप्रलयानंतर असे जीव उत्क्रांत होतीलच, ज्यांना त्यावेळी त्या परिस्थितीत स्वत:ची जीवनपद्धती प्रस्थापित करता येईल. जीवसृष्टी आहे तश्शीच राहील. फक्त थोडे फेरबदल होतील इतकंच. सजीवाचा आकार, रंग, गुणधर्म बदलले, बदलुदे!! काय वाईट झालं? काही नाही. तेव्हा काळजी करु नये. जगाचं समीकरण हे अस साधा सिंपल आणि सरळसोट आहे - शक्ती, बुद्धी आणि क्रौर्य - या तीन गोष्टींचा समेट ज्या जीवात नीट घडून येतो, तो जीव तगतो. बाकीचे गेले तेल लावत! आता मला सांगा, अशा या जगात केवळ बुद्धी घेऊन आलेल्या माझ्यासारख्या अडीच वीत उंचीच्या जीवाला, रडायला नाही का येणार? जग नेहमीच समतोल राखुन ठेवतं. त्यामुळे जसजशी माझ्यातली शक्ती आणि क्रौर्य वाढत गेलं, तसतशी माझी बुद्धी त्याप्रमाणात कमी होत गेली. आज माझ्यात या तीनही गोष्टी किती प्रमाणात आहेत, माहित नाही. पण तीन्ही आहेत, नाहीतर आत्तापर्यंत जिवंत कसा राहिलो असतो? मी कोण आहे? मी निसर्ग आहे! आंणि हा सगळा पसारा मी मला स्वत:शीच खेळता यावं, म्हणून माझ्यासाठीच मांडून ठेवलाय!

मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२

मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है

मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है,
खुदा भी अभी तक जिससे अन्जान है.
मिटा दी है वक्त ने मासुमियत इस चेहरेसे,
आँखे बताती है इरादा, क्या करु मैं, पहलेसे.
दिल तो साहब साफ है, पर जिस्म बे-ईमान है
मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है,
काबिल को अपनी मंजिल पे लेजाने का जो राज है
बेकार हम बैठे ह्ये, काम कर रहे अल्फाज है.
दिमाग ये जागा है तब जब दिल हुआ बेजान है
मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है,
तू ही साहिल, तू ही मंजिल, तू ही है ये जिंदगी
तू नही तो कुछ नही, ये जिंदगी है बेतुखी
तेरे दीदार से समझता हु की मुझमे जान है
मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है,
हुस्न का ये रंग कभीसे मुझपे क्यु नाराज है
ना तेरा साया दिखा है, ना सुनी आवाज है
इंतजार मे तेरे बंदा हुआ हैरान है
मेरे हर लफ्ज मे छुपा हुआ तूफान है,
तेरे बिना ये जिंदगी मेरी हुयी सुमसान है,
तू नही तो जिंदगी में बची कहा वो शान है
मेरे हर लफ्ज मे अभीभी छुपा तूफान है
उपरवाला खुदा भी अभी तक अंजान है
('काला बाजार' या देवानंदच्या चित्रपटातील 'अपनी तो हर आह इक तूफान है' या गाण्यामुळे प्रेरित होऊन)

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२

प्रेमाचा विडा

तुझी नि माझी जोडी जमली, तर किती गं येईल मज्जा!
बँडस्टँडवर जाऊन रोमान्स करु, गं सोडून सगळी लज्जा!
गीतांजलीच्या बागेमधली फुलं गं गपचूप वेचू,
गच्चीत जाऊन लाडात येऊन एकमेकांना जवळ खेचू
क्लास बुडवून, थापा मारून भेटण्यात असतं खरं थ्रिल!
क्लास संपला तरी भेटता येईल, देअर्स अ वे इफ देअर्स अ विल!
रात्रभर कॉल नि चॅटिंग करू, झोपून उठू दुस-या दुपारी
टीनेज प्रेमाचे विक्रम करण्याचा, घेतलाय विडा, घेतली सुपारी

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

आम्हांला काय हवंय?

माझे सगळे शाळकरी मित्र इंजिनिअरिंग करताहेत. माझी सहामाही परिक्षा नुकतीच संपल्याने मला सध्या भरपूर वेळ असतो आणि म्हणून मी त्यांना "भेटायला येता का?' असं विचारायला फोन किंवा मेसेज करत असतो. एरवी त्यांचे क्लासेस, कॉलेज किंवा परिक्षा असल्या की ते "नाही' म्हणतात. पण मी परवापासून विचारतोय तर एकजात सगळ्यांचं एकच उत्तर - असाइनमेंट्‌स आहेत रे! खूप आहेत. सॉरी, नाही जमणार. पुढच्या आठवड्यात एक्साम्स आहेत, त्यांचा अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळत नाहीये. मी विचारलं, की या असाइनमेंट्‌सचा मार्क मिळण्यापलीकडे काही उपयोग आहे का, तर सगळेच जण नाही म्हणाले. म्हणजे हा सुद्धा शाळेत असताना निरर्थकपणे वह्या पूर्ण करण्यात मुलांचा वेळ, शक्ती, शाई, कागद, पैसा(त्यांच्या पालकांचा) आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे त्यांचा चांगला मूड वाया जायचा, आणि अजूनही जातो, त्यातलाच एक प्रकार. कॉमर्समध्ये आम्हांलाही असेच दहा-दहा मार्कांचे प्रोजेक्ट्‌स दिले जातात. हे प्रोजेक्ट्‌स कॉलेजने दिलेल्या वहीतच करून द्यावे लागतात, नाहीतर शून्य मार्क मिळतात. कॉलेजने दिलेल्या वहीचा दर्जा अतिशय हीन असतो. तरी एका वीस पानी वहीसाठी आम्हाला गेल्या वर्षी पन्नास रुपये मोजावे लागले होते. प्रत्येक विषयाला एक वही. असे 7 विषय. विद्यार्थ्यांनी आरडाओरड करून देखील पावत्या मिळाल्या नव्हत्या, किंवा वह्यांची किंमतही कमी झाली नव्हती. यावर्षी वह्यांच्या ऐवजी पस्तीस रुपयांत सात छोटी बुकलेट्‌स वाटली गेली. म्हणजे एका बुकलेटची किंमत पन्नास वरून पाच रुपयांवर आली. नव्या क्रेडिट सिस्टीमनुसार दहा मार्क उपस्थितीला दिले जातात - "हवं तर मार्क देतो, पण कॉलेजात बसा,' अशी गयावया शिक्षण खातं आपल्याकडे करतंय, असाच सूर विद्यार्थ्यांमध्ये निघताना दिसायला लागला. मार्क हे एखाद्या विद्यार्थ्याला किती येतंय, हे ठरवण्यासाठी दिले जायचे. तुझं बूड सहा महिन्यांसाठी तू रोज कॉलेजच्या तुझ्या वर्गातल्या बाकडावर टेकवलंस की तुला दहा मार्क मिळतील, या पद्धतीला काय अर्थ आहे. बूड टेकवल्याने डोचक्यात काय शिरणार आहे? मार्कांच्या आमिषाने मुलं वर्गात बसतात सुद्धा, पण शिक्षक एखाद्‌-दुसरे सोडले तर बाकी सगळे अतिशय बकवास असतात. कॉलेजमध्ये आल्यापासून मी स्वत: काठावर पास होणारा विद्यार्थी आहे. मार्कांच्या आमिषांना भुलून मी मी कॉलेजला जात नाही. त्यामुळे कॉलेजमधल्या शिक्षकांच्या योग्यतेबद्दल मला जास्त काही बोलता येणार नाही. पण शाळेत डोकाऊन बघावं, तर मी बरंच काही बोलू शकतो. आम्हांला आठवीत असताना सेमी-इंग्रजीच्या वर्गाला सायन्स शिकवायला एक शिक्षिका आली होती. टेम्पररी होती ती. ती मराठी सायन्सचं पुस्तक घेऊन यायची आणि सरळ सरळ मराठीतून धडा शिकवायची - शिकवायची म्हणजे, वाचून दाखवायची. तेही तिला नीट वाचता यायचं नाही. आमच्या वर्गातली दोन-तीन हुशार मुलं-मुली, आणि माझ्यासारखी काही आगाऊ कार्टी, जेव्हा तिला एखादा प्रश्न विचारायचे, तेव्हा तिची धांदल उडायची. मग अख्ख्या वर्गाकडे नजर टाकून, "कोण सांगेल याचं उत्तर? येतंय का कुणाला?' कुणीच हात वर केला नाही, की "उद्या शोधून आणा. नाहीच सापडलं तर मी सांगते.' मग ती दुसऱ्या दिवशी स्वत: त्याचं उत्तर शोधून आणायची. मी मुद्दामून तिला उलटसुलट शंका विचारून गोंधळात पाडायचो. एकदा तिला मी jaggery म्हणजे काय, ते विचारलं होतं. तर jaggery म्हणजे "आर्द्रता' म्हणाली. थाप मारावी, तर थोडा तरी विचार करून मारावी की गं. गायीसाठी तयार करण्यात येणाऱ्या आंबोणामध्ये शेतकरी आर्द्रता का आणि कशी मिसळेल, हे मला पडलेलं एक कोडं आहे. विद्यार्थ्यांनी तिची तक्रार केली. तेव्हा तिचं परिक्षण घेतलं गेलं. त्या परिक्षणाच्या वेळी तिने कधी नव्हे ते फळ्यावर इंग्रजीमध्ये धड्याचे मुख्य मुद्दे लिहून काढले. त्यांत तीन-चार स्पेलिंग च्या चुका होत्या. अक्षरसुद्धा परिक्षकांना नीट वाचता येणार नाही असं काढलं होतं बहुतेक. आणि बाईसाहेब कधी नव्हे ते फाड-फाड इंग्रजीतून बोलत होत्या. अर्थात त्यांची इंग्रजीमधील शब्दसंपत्ती बेताचीच होती म्हणा. पण नुसतं इंग्रजी येत नाही म्हणून नाही, तर तिला शिकवताच यायचं नाही, म्हणून मला तिचा राग यायचा. तिला त्या परिक्षणानंतर काढून टाकण्यात आलं. आठवीतच आमच्या इंग्रजी सुपर्ब शिकवणाऱ्या परब मॅडम रिटायर झाल्या, आणि त्यांच्या जागी कोणीतरी नवीन बाई आली. तिही अर्थात टेम्पररीच. गाईडमध्ये इंग्रजीच्या धड्यांचं मराठीत भाषांतर दिलेलं असायचं. ती भाषांतरं कापून या बाई आपल्या पुस्तकात ती कात्रणं धड्यांप्रमाणे घालून ठेवायच्या आणि मग आम्हांला शिकवायला यायच्या. त्यांचा आवाज कधी आमच्यापर्यंत पोचलाच नाही. लवकरच त्यांचीही गच्छंती झाली. संस्कृतला नव्या बाई आल्या. थोड्या बोबड्या होत्या(आहेत). भरपूर लिहायला लावायच्या. लिहायला देताना त्या "त' चा उच्चार "त्‌' असा करायच्या आणि अर्ध्या त चा उच्चार पूर्ण करून मग त चा पाय मोडा असं सांगायच्या. तरी हे ठीक आहे. बाकी तश्या बऱ्या शिकवायच्या. निदान त्यांना विषयाचं ज्ञान तरी होतं. असो. बऱ्याचदा मुलांची अशी ओरड असते, की मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीच्या वर्गांकडे जास्त लक्ष दिले जाते, त्या वर्गाचे इतर वर्गांना अवाजवी दाखले दिले जातात, ज्यामुळे विनाकारण सेमी-इंग्रजी आणि इतर वर्गांत आपोआपच तेढ निर्माण होते. तसेच दहावीच्या परिक्षेत सेमी-इंग्रजीच्या विद्यार्थ्यांकडूनच जास्त अपेक्षा असल्याने शिक्षकांकडून त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्यात येते आणि इतर वर्गांकडे दुर्लक्ष होते. प्रत्येक पुस्तकात प्रत्येक धड्याखाली स्वाध्याय म्हणून प्रश्नोत्तरं दिलेली असतात. वरकरणी मुलांना धड्यातलं किती येतंय, हे त्यांना कळावं, म्हणून स्वाध्याय दिलाय, असं सांगितलं जातं. मुलं काय मूर्ख आहेत? पेपर काढणं सोयीचं जावं, म्हणून हे स्वाध्याय दिलेले असतात, हे चटकन मुलांच्या लक्षात येतं, आणि गाईड मधून फक्त धड्याखालची प्रश्नोत्तरं पाठ करून ही मुलं परिक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवतात. मुळात धड्याखालचे स्वाध्याय देणं बंद करून, मागल्या वर्षींचे पेपर उपलब्ध करून देणे तात्पुरतं बंद केलं, की आपोआप मुलं सगळे धडे पूर्णपणे वाचतील आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या डोक्यात भर पडेल. अशा रितीने घेण्यात येणारी परिक्षा सुद्धा खरी असेल आणि त्याचा निकाल सुद्धा. इतिहास-नागरिकशास्त्र या विषयांना मार्कांच्या दृष्टीने जे महत्त्व दिलं जातं, ते अतिशय गैर वाटतं मला तरी. खरं तर इतिहासापेक्षा नागरिकशास्त्र हा विषय जास्त महत्त्वाचा आहे. पण नागरिकशास्त्र हा विषय कंटाळवाणा आहे. त्यात त्याला चाळीसापैकी फक्त बारा मार्क असल्याने कुणाला परिक्षेच्या वेळीही त्याचा अभ्यास करावासा वाटत नाही. नागरिकशास्त्राचा अभ्यासक्रम चांगला असतो, पण परिक्षेच्या दृष्टीने त्याला फारसं महत्त्व न दिल्याने त्याच्याकडे विद्यार्थ्यांकडून कानाडोळा केला जातो. हे अगदी साहजिकच आहे. त्यामुळे चाळीसापैकी अठ्ठावीस मार्क नाशा ला, आणि फक्त बारा मार्क इतिहासाला द्यावेत, जेणेकरून मार्कांचे महत्त्व लक्षात घेऊन तरी मुलं या विषयाचा अभ्यास करतील. इतिहासच्या पुस्तकाकडे एक गोष्टीचं पुस्तक म्हणून बघितलं जातं. त्यामुळे मार्क कमी केले तरी वाचणारी मुलं इतिहासाचा अभ्यास करतीलच. मराठी विषयांत घरी धडे वाचून येऊन परिक्षेत ते न बघता लिहायची पद्धत मला अजिबात आवडत नाही. अहो तुम्हांला मुलांच्या भाषेचं ज्ञान वाढवायचंय की पाठांतर? "दोन्ही' असं म्हणाल तर पाठांतर इतर विषयांमध्येसुद्धा होतच असतं. त्याची मराठी विषयात गरज काय? कवितांचं पाठांतर चालेल, पण धड्यांचं कशाला? एकूण अभ्यासक्रम तसा फारसा वाईट नसतो, पण त्यातही सुधारणेला भरपूर वाव आहे. पण महाराष्ट्रातल्या सर्व स्तरातल्या मुलांना झेपेल, असा अभ्यासक्रम काढला जातो. तेव्हा, सर्व राज्याला एकच अभ्यासक्रम ठेवण्याऐवजी, जिल्ह्यानुसार अभ्यासक्रमाची पातळी ठेवण्यात यावी, असंही बरेच विद्यार्थी म्हणतात. उदाहरणार्थ, मुंबई-ठाण्यासारख्या जिल्ह्यांत, जिथे महाराष्ट्रांतील बहुतांश जिल्ह्यांच्या मानाने विद्यार्थ्यांना हव्या त्या सुविधा मिळणे सोयीस्कर जाते, तिथल्या अभ्यासक्रमाची पातळी आणि दर्जा जास्त ठेवला जावा. अनेक शाळांमध्ये आठवीपासून संस्कृत, हिंदी किंवा काही शाळांमध्ये विदेशी भाषांचे पर्याय दिले जातात. त्याऐवजी(किंवा त्याबरोबरच) अर्थशास्त्र या विषयाचा पर्याय ठेवण्यात यावा. दहावी झाल्यानंतर मुलांना विज्ञान, वाणिज्य किंवा कला यापैंकी एक शाखा निवडावी लागते. इतिहासाप्रमाणेच भूगोलाचे महत्त्व कमी करून अर्थशास्त्र हा विषय आठवीपासूनच मुलांना लागू केल्यास दहावीपर्यंत आपल्याला कोणत्या शाखेत जास्त रस आहे, याची योग्य कल्पना मुलांना येऊ शकेल. हे सर्व एक विद्यार्थी म्हणून सुचवत असताना एक नमूद करावेसे वाटते, की वर्षानुवर्षे सह-विद्यार्थ्यांशी सहज अधूनमधून चर्चा करून समोर आलेले विचार मी येथे मांडले आहेत. हे आणि असे विचार योग्य असतीलच, असं नाही. पण एकूणच विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणपद्धतीविषयी काय काय कल्पना आणि विचार आहेत, ते मांडण्याचा मी एक प्रयत्न केला आहे(यात एक विद्यार्थी म्हणून माझ्या काही कल्पना आणि विचार यांचाही समावेश होतोच). हे आमचे विचार आम्ही कुणापुढे मांडायला जावं, तर "अभ्यास करा आधी स्वत:चा; ते सोडून नसत्या उखाळ्यापाखाळ्या काढत बसल्येत विद्वान' असं म्हणून आम्हांला गप्प केलं जातंच(अर्थात्‌, मी अभ्यास करत नाही, यात बरंच तथ्य आहे म्हणा). म्हणून इथे मांडतोय. चुकलो, तर दुरुस्त करा; पटलं, तर अंमलात आणा, एवढीच विनंती.

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

ट्रेन आणि थुंकी

शाळा संपली; दहावी पास झालो. चांगल्या कॉलेजात प्रवेशही मिळाला. आणि ओघानेच ट्रेनने नियमितपणे प्रवास करण्याचे दिवस सुरु झाले. ट्रेनमध्ये गर्दी असते, त्यापेक्षा बस बरी - अशा मताचा मी होतो. पण माझं हे मत, मला लहान असताना आईबरोबर लेडिज कंपार्टमेंटात दरवेळी चढावं लागल्याने तयार झालं होतं, तेव्हा आता ते मत बदलून, जनरल डब्यातला माझा रोजचा प्रवास माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक सुखमय होऊ लागला. कधी जास्त गर्दीतून जावं लागलं, तरी मजा यायची. आणि मग ट्रेनपेक्षा बसचा प्रवासच कितीतरी जास्त क्लेशकारक आहे, अशा मताचा मी झालो. पहिला महिनाभर सेकंडक्लासात घालवला. मग कन्सेशनपास मिळायला लागल्यापासून फर्स्टक्लासने यायला लागलो. सकाळी-सकाळी गोरेगाव-जोगेश्वरीला लागून जलद ट्रेन दौडु लागली, की पूर्वेकडे उगवणारा भलामोठा तांबडा सूर्य बघून आपण दहिसरला का बरं राहतो, असं राहून राहून वाटतं. वांद्रे जवळ आलं की तिथल्या खाडीत प्रत्येक ट्रेनच्या या-ना त्या डब्यातून कचऱ्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या पडायला लागतात, तेव्हा त्यांना फेकणाऱ्या लोकांनाच फेकून द्यावंसं वाटतं. पुढे माहिम-माटुंगा हा प्रवास जीव (म्हणजे नाक) मुठीत धरून करावा लागतो, निदान सकाळच्या वेळीतरी. माहिम-माटुंगा दरम्यानच्या सर्व रेल्वेपट्ट्‌या म्हणजे मुंबईतील सर्वात मोठं सार्वजनिक मलनिस्सारण केंद्र आहे, असं म्हणायला हरकत नाही. केवळ मोठं असल्यानेच तिथे रांगा लागत नसाव्यात, इतकाच काय तो त्यातला आणि बाकी "सुलभ' मधील फरक. दादरला ट्रेन लागली, की अतिशय चिंचोळ्या जिन्यांवर मुंबईकरांच्या फौजा चढाव करायला सुरुवात करतात, ते बघणं म्हणजे एक डिफरंटच अनुभव असतो. सेकंडक्लासात मराठमोळ्या, तर फर्स्ट क्लासात प्रामुख्याने गुर्जरगप्पा कानी पडतात. कधीकधी हिंदी आणि इंग्रजीत गप्पा झाडणारी माझ्यासारखी कॉलेजवयीन मुलं सुद्धा येतात. बारावीत भल्या पहाटे उठून क्लासला जायचो, म्हणून वसई-विरार वरून येणाऱ्या गाडीत चढायचो. तिथे तर भलताच प्रकार. वसईच्या लोकांची भाषा काही निराळीच आहे. त्यातलं ओ-का-ठो मला कळलं नाही कधी. या गाड्यांमध्ये एखाद-दुसरे नायजेरियन नागरिक सुद्धा दिसून येतात. विरारवरून येणारी बहुतेक मंडळी, ही अंगापिंडाने चांगली मजबूत असतात. त्यामुळे "अपना पैर हटाओ, हात निकालो, बाजू हटो ना, उतरो जल्दी जल्दी' अशा तुसड्या स्वरातील सुचना त्यांना द्यायला माझं मन (आणि तोंड) कधीही धजत नाही. ट्रेनमध्ये सगळ्यांत मजेशीर आणि कधीकधी(म्हणजे तशी नेहमीच) किचकट वाटणारी एक गोष्ट म्हणजे लेडीज डब्याबाहेरचा आणि आतला गोंधळ, धक्काबुक्की आणि कलकलाट. त्या डब्यात आधी कोण चढतो (ते), यावरून (अक्षरश:) मारामारी होते. एकमेकींच्या वेण्या, ओढण्या, पदर ओढत या बायका ना धड स्वत: नीट चढतात, ना दुसऱ्याला चढू देतात. बरं गाडी ज्या दिशेनं चालली आहे, त्यादिशेकडे तोंड करून कधीही चढणार किंवा उतरणार नाहीत. वसई-विरार ट्रेनमध्ये, परतीच्या वेळी, गोरेगाव-मालाड(आजकाल काही ठरावीक गाड्या थांबतात), दहिसर इथे हमखास बाया प्लॅटफॉर्मवर उतरताना तोल जाऊन आदळताना आढळतात. काही स्त्रिया माझ्या या सगळ्या निरीक्षणावर आक्षेप घेतील बहुतेक, पण माझ्या कित्येक मैत्रिणींनी स्वत:च या गोष्टीची "लेडीज कंपार्टमेंट? बापरे! डोंट आस्क!' अशा काहीशा शब्दांत कबुली दिली आहे, की "जेंट्‌स खूपच को-ऑपरेटिव्ह असतात.' सकाळी सकाळी विरारहून येणाऱ्या गाड्या आमच्या बोरीवलीहून निघालेल्या संथ गतीच्या ट्रेन्सच्या बाजूने भरधाव वेगाने जातात. त्यांच्या कोणत्यातरी डब्यामध्ये झांजांचा आवाज नेहमी येत असतो. लोक भजन म्हणत असतात. मला एकदातरी त्या भजन गाणाऱ्या लोकांच्या डब्यातून प्रवास करायचा आहे, पण आजपर्यंत तरी तो योग आलेला नाही. दहिसरला सकाळी अकरा वाजून सतरा मिनिंटानी येणाऱ्या गाडीमध्ये पुढच्या फर्स्टक्लासमध्ये काही अयोध्येकरांनी रामाच्या रटाळ आरती-स्तोत्रांचा सपाटा लावलेला असतो. खरं तर, त्या आरत्या रटाळ नसाव्यात, पण त्या गाणाऱ्या लोकांचचं स्वरज्ञान बेताचं असतं, त्यामुळे त्या डब्यात चढलं, की डोकं फिरतं. पण एक वेगळीच गोष्ट आहे, जी या सगळ्यापेक्षा हटके आहे, आणि भारतीय रेल्वेची ती एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक स्टेशनावरील चित्रविचित्र पोशाखातील विविध रंगाढंगाच्या मुलींपेक्षाही हीगोष्ट माझ्या जास्त नजरेत भरत आलीय. ती म्हणजे - पिचकारी - थुंकी ! रेल्वेने रोज हजारो लोक प्रवास करत असतात. त्यातले शेकडो लोक येता-जाता थुंकत असतात. कोणी दरवाज्यात लटकत असताना अधून-मधून थुंकतं, कुणी त्या लटकणाऱ्यांना बाजुला व्हायला सांगून स्वत:ची पिंक टाकून घेतं, तर कुणी खिडकीच्या गजांमधून थुंकतं. कुणी पचा-पचा थुंकत राहतात, कुणी घसा खरवडून "खर्राक्‌... थू' करतात. कुणी जीभेनं आणि प्रसंगी बोटाने तोंडात उरलेला सगळा चोथा ओठांशी आणून मग थुंकतात. कुणी थुंकतंय की ओकतंय तेच कधी कधी कळत नाही. काही जण हनुवटी गळ्याजवळ आणून, मग ती पुढे नेताना थुंकतात, जेणेकरून थुंकी लांबवर उडावी. काहीजण नुसतेच जुन्या नळातून सरळ पाणी खाली गळावं तसे थुंकतात. कुणी लाल थुंकतात, कुणी नुसताच पांढरा फेस थुंकतात, कुणी थुंकायला मजा येते म्हणून सुद्धा थुंकत असावेत - काही सांगता येत नाही. अहो, ढुंगणातून काढायचा, तो धूर नळकांडी वापरून तोंडातून काढणारे आणि त्याला "कूल' म्हणणारे का थोडे आहेत? त्यांच्या तुलनेत थुंकणं हे कूल असतं, असं कुणी मानलं तर त्यात विकृती ती कसली? असो. लहानपणी मला या थुंकणाऱ्यांकडे बघून मोठी मजा वाटायची. रस्त्यातून येता-जाता मला जागोजागी थुंकलेलं दिसून यायचं. एकेकाची थुंकी भरपूर मोठ्ठी असायची. मी एकदा थुंकुन पाहिलं, तर माझी थुंकी त्यामानाने खूपच छोटी वाटली मला. मी नाराज झालो. पण त्यावेळी आपण सलमान खानला फायटिंग शिकऊ शकतो, असे मानणारे काडी-पेहेलवान आम्ही! थुंकी मोठी दिसावी, म्हणून लोक ती आधी तोंडात साठवून घेत असावेत, आणि पुरेशी साठली, की मग थुंकत असावेत, असं मला वाटलं. कारण असं केल्याशिवाय माझी थुंकी मोठी येत नाही, आणि जर माझी येत नाही, तर इतर कुणाची कशी बरं येईल? या गोष्टीला इगो-सेंट्रलिझम असं म्हणतात म्हणे - लहान मुलांमध्ये नेहमी आढळून येतो. काही जण म्हणतात, की तो माझ्यात अजूनही आहे. ते जाऊ दे. तर आईबरोबर एकदा फिरत असताना, माझ्या बाजूने एक माणूस गेला आणि जाताना थुंकला, त्याची थुंकी छानपैकी नाण्याच्या आकाराएवढी मोठी होती. मी लगेच प्रयोग करून बघितला. चांगली तीन-चार मिनिटं मी तोंडात जमेल तेवढी थुंकी गोळा करण्यात घालवला. मग मी ती थुंकलो. लगेच आईने मला फटका मारला, तिथल्या तिथेच. "सगळे थुंकतात म्हणून मी सुद्धा थुंकतो, मला मोठी थुंकी हवीये सगळ्यांसारखी', असं मी म्हटल्यावर मला अजून एक फटका बसला. "ते थुंकणारे लोक घाण्णेड्डे असतात, आपण थुंकायचं नाही त्यांच्यासारखं' अशी समज मला देण्यात आली. तेव्हापासून मी रस्त्यात थुंकणं जे बंद केलं(त्यापूर्वी तरी असा कितींदा थुंकलो होतो म्हणा), ते आजतागायत मी कधी थुंकलेलो नाही, आणि थुंकणारही नाही. लहान असताना सुट्टीत ठाकूरद्वारला आजीकडे जायचो, तेव्हा तिथल्या चौथ्या मजल्यावरून जिन्यामधून वाकून बघायचो, आणि थेट तळमजल्यावर नेम लाऊन थुंकायचो. एवढ्या वरून स्वत:ची थुंकी खाली जाताना बघताना मजा यायची. तो खेळच होता माझा. कंटाळा येईपर्यंत खेळत बसायचो रोज संध्याकाळी. एकदा कुणा बाईच्या अंगावर माझी थुंकी पडली. तिने मान वर करून बघायच्या आतच मी मान मागे केली आणि घरात धूम ठोकली. तेव्हापासून तो खेळ बंद झाला. आता मी ना रस्त्यात थुंकायचो, ना जिन्यात. पण उल्हासनगरला जात असताना, ट्रेनमध्ये माझ्या समोर बसलेल्या आजीबाईंनी थुंकण्याची एक वेगळीच स्टाईल मला दाखवली. म्हणजे, त्या थुंकत होत्या, मी बघितली. दात एकमेकांवर ठेऊन त्यांच्या फटींमधून त्या खिडकीबाहेर थुंकत होत्या. मला ते बघून सापाच्या फुत्काराची आठवण झाली. लगेच मलाही त्याचं प्रात्यक्षिक करायची हुक्की आली होती, पण सार्वजनिक ठिकाणी थुंकणं मी बंद केलं असल्याने, मला आमच्या बाथरूमात त्याचा प्रयोग करावा लागला - अर्थात तो अयशस्वी ठरला. कितीही केल्या माझ्या दातांमधून पुरेशी थुंकी बाहेर येईना. शेवटी मी नाद सोडला. आज मी अजिबात थुंकत नाही. कुठेही नाही. जेव्हा लोक थुंकतात, तेव्हा ते बघायला किळस वाटते. असं वाटतं की जाऊन एक थोतरीत ठेऊन द्यावी त्या थुंकणाऱ्याच्या. बोरिवली स्टेशनात पहिल्या आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मच्या मध्ये जे रूळ आहेत, त्यांच्यावरचे दगड, आणि मधलं लोखंडी कुंपण, हे सदैव लाल असतं. इतर सुचनांप्रमाणेच रेल्वेची बाई फाटक्या लाऊडस्पिकर मधून "यात्रियोंसे निवेदन है, की वे कृपया रेल्वे प्लॅटफॉर्मपर मत थुके. थुकनेसे बिमारी फैलती है' असं काहीतरी बरळत असते. तिच्याकडे कोण लक्ष देतं कुणास ठाऊक. तरी प्लॅटफॉर्मवर आजकाल नाही कोणी थुंकत जास्त. बहुधा दंड आकारत असावेत. रेल्वेने नव्या लोकल्स आणल्या, तर त्यावरही लाल रंगाची होळी खेळली जाऊ लागली. कोणाला म्हटलं, की बाबा रे, कशाला थुंकतोस, उगाच कशाला मुंबई खराब करतोस, तर "मुंबई? कचरपट्टी तो है, सब कचरा करते है. उसमे मैने जरासा थुक दिया तो इतना क्या बिघडने वाला है?' असंच काहीसं उत्तर ऐकायला मिळणारच. जिथे आपण राहतो, जी आपली कर्मभूमी आहे, तिचा जरासा तरी आदर उरी बाळगायला नको का? मला तर लहानपणीच समज आली नशीबाने, आता बाकीच्यांना कधी येईल ते बघूया. खरं तर शहाण्यास शब्दाचा मार... या नियमाने अश्या थुकाड्यांना बडवूनच काढायला हवं. सार्वजनिक मालमत्तेविषयी अनादराची प्रवृत्ती इतकी बोकाळली आहे, की कुल्यावर चार छड्या बसल्याशिवाय अशा लोकांना समज यायची नाही. चार-पाच वर्षं जरी थुंकणाऱ्यांवर आणि कचरा टाकणाऱ्यांवर जरब ठेवली, की भितीपोटी का होईना, या वाईट सवयी सुटतील. आणि एकदा त्या सुटल्या, मनोवृत्ती बदलली, की आपोआप स्वच्छतेची आवड निर्माण होऊन लोकच या नियमांचं पालन करतील. एवढंच नाही, तर त्यांची मानसिकता एवढी बदलेल, की प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवणाऱ्यांची गरजही लागणार नाही; एखाद्या थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला रेल्वेमधल्या डब्यातील एकजात सगळ्यांनी झापताना, सुनावताना मला बघायचंय. लाजेनं थिजुन जाऊन ती व्यक्ती नरमली तर ठीक, नाहीतर अशा माणसाला थोडा चोप मिळाला तरी हरकत नाही. आणि एकदा का अशा प्रसंगांना सुरुवात झाली, की आपोआपच अमेरिका आणि लंडनसारख्या प्रदेशांना पॉश मानणाऱ्यांना सध्या कचऱ्याखाली गाडला गेलेला आपला "पॉश' देश दिसू लागेल.

सोमवार, १३ ऑगस्ट, २०१२

मुली आणि आम्ही


परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे. बरं, एवढं करून 'आमच्या क्लासमध्ये चांगला दिसणारा एकही मुलगा नाही', 'आमचे सर सुंदर मुलींच्या बाबतीत जरास्से हेच आहेत, पण काय शिकवतात म्हणून सांगू!' - हे आहेच. आता जर असं असेल, तर अशा क्लासला जाताना तरी नट्टापट्टा करायची काय गरज? बरं, त्यांना तसं विचारून बघा, तर 'छे! मी अजिबात मेकअप करत नाही हा! ती अमूक अमूक करते मेकअप. मी फक्त क्रीम लावते, आय लायनर लावते, काजळ घालते, आणि लिप ग्लॉस लावते - बास्स! एवढंच!' यातली अमूक अमूक म्हणजे या मुलींची नावापुरती असलेली कोणीतरी जीवलग मैत्रीण असते. हे सगळं ऐकलं की, मेकअप म्हणजे नेमकं काय करत असाव्यात या मुली अजून, असा प्रश्न पडतो मला. अर्थात, याबाबतीत माझी जिज्ञासा जास्त तीव्र स्वरूपाची नसल्याने या प्रश्नावर मी जास्त विचार करत बसत नाही. एकदा कॉलेजमधल्या माझ्या एका मैत्रीणीबरोबर ट्रेनमधून घरी परतत असताना तिने मला विचारलं, 'तुम्ही पुरुष मंडळी रोज-रोज दाढी करत बसता, त्यापेक्षा एकदाच गाल वॅक्स का नाही करून टाकत?' आता चेहऱ्याला मेण लावल्याने दाढी उगवणं कायमचं बंद होतं की काय, अशा निरागस कल्पनेनं माझं मन अचंबित झालं होतं; अहो मेण हे फक्त दिवे गेल्यावर उपयोगी पडतं, असा माझा जन्मापासूनच समज होता. माझ्या मेण न लावलेल्या, आणि अर्धवट हिरव्या पडलेल्या त्या चेहऱ्यावर मला झालेला हा नवा साक्षात्कार स्पष्टपणे प्रकट होत होता. मी तरी माझं मेणासंबंधीचं अज्ञान लपवण्याच्या हेतूने म्हटलं, 'छ्‌या बुवा! आपल्याला त्या वॅक्स पेक्षा शेविंग क्रीमच सोयीचं पडतं. फेस आला की कसं, दाढी करायला मजा येते. मेणाला फेस येतो का? नाही. त्यामुळे त्यात मजा नाही.' दुसऱ्याच्या अज्ञानाला हसू नये, ही शीकवण मी नेहमीच पाळत आलोय. अहो मी लोकांच्या अज्ञानाला त्यांच्या पाठीही हसत नसतो. आणि ही बया इतक्या मोठ्याने हसायला लागली म्हणता, मला काही कळेनाच. 'अर्रे!! वॅक्स म्हणजे ते वालं वॅक्स नाही! वॅक्सिंग वॅक्सिंग!!' मी आपलं उगाचच, 'अच्छा अच्छा, वॅक्सिंग होय! मला वाटलं-' तसं मला तोडत ती म्हणाली, 'राहू दे हां विद्वान साहेब, तुला वॅक्सिंग म्हणजे माहित नाही ते ऍड्‌मिट कर. फेस इट, फेस इट!' यातल्या फेस इट वर तिने इतका जोर का दिला, ते मला कळल्यावाचून राहिलं नाही, पण मी माझं अज्ञान मान्य केलं. तसा मी खिलाडूवृत्तीचा आहे. नाही माहिती तर नाही माहिती आपण कशाला लपवा? त्या दिवशी स्त्रियांच्या फक्त डोक्यावरच केस उगवतात, आणि ते फक्त डोक्यावरच उगवत असल्याने ते जास्त असतात, या माझ्या ठाम समजुतीचा अंत झाला. माझ्या ज्ञानात भरपूर भर घालण्यात आली, आणि काही दूरूस्तीची कामे सुद्धा पार पडली. इतकंच नाही, तर मला अजून कोणी गर्लफ्रेंड का मिळाली नाही, याचे मुक्त आणि व्यक्त समीक्षण झाले. अर्थात्‌, मगाशी सांगितल्याप्रमाणे, मी अतिशय खिलाडूवृत्तीचा असल्याकारणाने मी ते सर्व मुकाटपणे ऐकून घेतलं. पुरुषांप्रमाणे मुलीसुद्धा दाढीमिशी करतात, हे मला आता समजलेलं आहे. दाढी करण्याला त्यांनी ब्लिचिंग असं नाव ठेवलंय, आणि मिशी काढली, असं म्हणायच्या ऐवजी 'मी अप्पर लिप्स करून आली' असं थर्ड पर्सन सिंग्युलरचं व्याकरण स्वत:साठी लावत त्या रोखठोकपणे सांगतात. मुलींच्या चेहऱ्यावरचे केस त्या ब्लिचिंग करून घालवतात की असं काहीतरी जेव्हा माझ्या कानावर आलं, तेव्हा आमची मोलकरीण जमीन साफ करायला जी ब्लिचिंग पावडर वापरते, तिने चेहरा सुद्धा साफ करता येतो हे मला अजिबात पटेना. वॅक्सिंगच्या एका अनुभवाने मी शहाणा झालो होतो, म्हणून ज्या सुमुखीच्या तोंडून 'मी पार्लरला जात्येय, ब्लिचिंग करायचंय' असं मी ती चेहऱ्याभोवती बोट फिरवून दाखवत असताना ऐकलं, तेव्हा फक्त 'ब्लिचिंग?' एवढंच कपाळावर आठ्या आणत म्हणून मी माझं अज्ञान ग्रेसफुली प्रकट केलं. अर्थात्‌ या अज्ञानाबाबत माझं हसं झालं नाही. या मुली पार्लर मध्ये तासन्‌तास घालवतात. मेसेज करून चौकशी केली, की 'आता झालंय सगळं ऑलमोस्ट, फक्त क्लीन-अप बाकी आहे' असं उत्तर येतं. हे क्लीन अप करणं, म्हणजे सलून मध्ये न्हावी दाढी झाल्यावर तुरटी फिरवतो, त्याला समांतर असावं, असा माझा समज आहे. पण हा समज गैर असो वा नसो, मला या बाबतीतल्या माझ्या संभाव्य अज्ञानातच सूख आहे. या मुली सुंदर दिसण्यासाठी एवढी जोमाने तयारी करतात, याची मला काही वर्षांपूर्वी सूतराम कल्पना नव्हती. त्या मानाने आम्ही पुरुष मंडळी काहीच मेहनत घेत नाही असं म्हणायला हरकत नाही. जिम मध्ये रोज जाऊन चार बैठका मारल्या आणि गाढवासारखी ओझी उचलली, याला मेहनत म्हणायला आता मी तयार नाही. वास्तविक आम्हां पुरुषांना जास्त मेहनत करण्याची मुळी गरजच नाही हे आता माझ्या लक्षात आलं आहे. आमचं निश (niche) हे बायकांच्या तुलनेत जास्तच असणार, याची मला खात्री आहे. निश म्हणजे एखाद्या जीवाची निसर्गातील इतर घटकांच्या नजरेतील भूमिका, किंवा अवस्था. आम्हां पुरुषांच्या बाबतीत मला अवस्था हा शब्द जास्त सुटेबल वाटतो. असो. हे निश बहुतांशी प्राणी-प्रजातींत पुरुषांमध्ये जास्त चांगलं आढळून येत असावं. उदाहरणार्थ, सिंह-सिंहीण, मोर-लांडोर, चिमणा-चिमणी, कोकिळ-कोकिळा(मी दोघांनाही बघितलंय), कोंबडा-कोंबडी, बोका-भाटी, इ. प्रजातींमध्ये नर हे मादीपेक्षा सुंदर दिसतात. मला विचाराल, तर कुत्रा-कुत्री मध्ये सुद्धा मला कुत्राच जास्त छान वाटतो. इथे, एक नमूद करतो, की लांडोर आपल्याला तेवढी सुंदर वाटली नाही, तरी मोराला तीच सर्वांत सुंदर वाटते, कारण ते सजातीय आहेत. त्याचप्रमाणे, आपल्या पुरुष जातीला जरी स्त्री ही जगातील सर्वांत सुंदर वस्तू वाटत असली(आणि वाटायलाच हवी), तरी निसर्गाच्या दृष्टीतून आम्ही पुरुष मंडळीच जास्त सुंदर ठरतो, हे मात्र नक्की. या मला झालेल्या अवलोकनातूनच नट्टापट्टा करण्याची गरज पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त का भासते, हे मला उमगले.